"सस्पेन्शन ऑर्डर करा ! ....."
जागा बदलली, प्रदेश बदलला, देश बदलला म्हणजे संस्कृती ,प्रथा - परंपरेत नक्कीच काहीतरी बदल होत असतो. प्रत्येक बदल हा काही चांगलाच असतो असं नाही. प्रत्येक प्रथा हीच समाजहिताची , लोककल्याणकारी असते, असंही नाही किंवा नसतेच असेही नाही. काही प्रथा मात्र निश्चितपणे लोकहितासाठी, समाजातील दुर्बल घटकांसाठी असतात आणि त्या सर्वच ठिकाणी असतात. खरं म्हणजे कोणत्याही समाजामध्ये असलेल्या प्रथा आणि परंपरा ह्या विशिष्ट हेतूने लोककल्याणकारी आणि दुर्बल घटकांसाठी असाव्यात, अशी अपेक्षा असते मात्र कालांतराने त्यामध्ये कुणाचा तरी स्वार्थ जोडला जातो आणि त्या प्रथांची पूर्ती वाट लागली जाते लावली जाते. मग उरतात केवळ प्रथा आणि परंपरा .जेवढे लोक ,जेवढ्या पद्धती जेवढ्या संस्कृती असतात ,तेवढ्याच त्यांच्या ठिकाणी काही प्रथा असतात. कोणत्याही धर्म , कोणतीही प्रथा ,कोणतीही संस्कृती , मूळात वाईट नसते कारण ती निर्माण करण्यामागे हेतू हा नक्कीच लोकहिताचा असतो मात्र कालांतराने बदल होत होत त्यात काही माणसांचा स्वार्थ शिरतो आणि मग उरते निव्वळ प्रथा - परंपरा आणि त्याचा आंधळेपणाने लोकांनी केलेला स्वीकार !
एखादा मंत्र ,एखादी ऋचा ,एखादे वचन ,एखादी कृती किंवा एखादी प्रथा - परंपरा ही विचारपूर्वक केली काय आंधळेपणाने केली काय फारसा फरक पडत नाही . त्याचा परिणाम मात्र झाल्याशिवाय राहत नाही. माणूस औषध घेतो, पूजाअर्चा करतो , त्यामागे विश्वास असतो आणि हा विश्वास लोककल्याणासाठी, दुर्बल घटकांच्या हितासाठी असतो एवढं मात्र खरं ! माणसाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत असलेल्या सर्व क्षणांमध्ये अनेक प्रकारच्या प्रथा ,सर्वच धर्मांमध्ये ,सर्वच समाजामध्ये आढळून येत असतात. त्या का पाळाव्यात, याचा विचार मात्र करण्यात येत नाही, ही एक प्रकारची सामाजिक खंतच आहे. यामुळेच की काय टीकाकार म्हणतात प्रथा आणि परंपरांचे आंधळेपणाने पालन केले जाते ! जसा- जसा काळ बदलतो , माणसाची बुद्धी विकसित होते , विज्ञानाचा प्रसार होतो , त्याच वेळेसअनेकांचा ' डाव 'उघडकीस येतो तसा - तसा प्रथा आणि परंपरांमध्ये काही प्रमाणात तरी बदल व्हायलाच पाहिजे की नाही ? नक्कीच व्हायला पाहिजे मात्र त्यातील शास्त्र अन् तत्त्वांचा विसर मात्र माणसांना पडू नये अशी अपेक्षा कुणी करत असेल, तर त्यात चुकीचे तरी काय ? सगळ्याच प्रथा आणि परंपरा ह्या योग्य आहेत किंवा अयोग्य आहेत असा समज मात्र माणसाच्या मनात असायलाच नको हेही तितकेच खरे !
आधुनिकीकरणांमध्ये वाईट प्रथा या नक्कीच पायदळी तुडवल्या गेल्या पाहिजेत अन् माणुसकीच्या ,दुर्बल घटकांच्या हितासाठी असलेल्या देश- विदेशातल्या प्रथा आणि परंपरांचे अनुकरण सर्वच ठिकाणी व्हायला काय हरकत आहे ? माणसं एखाद्या हॉटेलमध्ये जातात, काही ऑर्डर करतात, त्याच वेळेला ते म्हणतात एक सस्पेन्शन सुद्धा द्या ! ही प्रथा युरोपमधल्या नॉर्वे या देशात असल्याचे सर्वत्र पसरले हे खरं आहे मात्र अनेक देश, अनेक प्रदेश आपल्या पद्धतीने, संस्कृतीने ही प्रथा पाळत आहेत. ग्राहकाने दिलेल्या ऑर्डर मध्ये सस्पेन्शन सह पैसे तो देतो आणि निघून जातो त्याला हवी असलेली ऑर्डर घेऊन ! काही वेळाने त्या ठिकाणी गरीब- दुर्बल माणूस येतो आणि काही सस्पेन्शन आहे काय, असं विचारतो. हॉटेल मॅनेजर ते सस्पेन्शन योग्य त्या व्यक्तीला शांतपणे देतो. हे सुरूच राहतं दिवसभर. सस्पेन्शन साठी पैसे देणाऱ्या आणि सस्पेन्शन घेणाऱ्या माणसाला माहीत नसतं कुणी दिलं, कुणी घेतलं ! कुणाला त्याची गरज ही भासत नाही कारण गरजू व्यक्तींसाठी केलेलं ते दान असतं - सस्पेन्शन या शब्दाखाली ! जगामध्ये मानवनिर्मित आणि निसर्गनिर्मित अनेक प्रकारचे दुर्घटना घडत असतात ,त्यावेळेला जगातील माणसंच नव्हे देशाचे राज्यकर्ते सुद्धा धावून जातात, सहकार्य करतात मदत करतात कारण त्यांच्यामध्ये माणुसकीची भावना ही निश्चित कायम असते अन् कुणाला तरी मदत करण्याचीही गरजही असते.भारतीय संस्कृतीमध्ये सुद्धा अशाच प्रकारे विविध प्रकारचे दान करण्यात येते मात्र त्याचा फायदा हा गरजू व्यक्तींना झाला तर त्या समाधानाचं मोल देणाऱ्याला असतं. गरज नसताना, दुर्बल नसताना फुकट घेणाऱ्याला नाही !
(प्रस्तुत लेखक हे प्रसिद्ध स्तंभलेखक ,शिक्षण तज्ञ असून त्यांच्या सावित्री फाउंडेशन , अकोला च्या माध्यमातून सक्रिय सामाजिक, शैक्षणिक कार्य करतात.)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा