महत्व वटसावित्रीचे,करूया रक्षण पर्यावरणाचे
लेखक
- चारुदत्त चौधरी
अ. भा. ग्राहक पंचायत, अमरावती
संवाद : 9420402122
प्राचीन भारतीय संस्कृती ही एकूणच समाजहिताला पोषक आहे आणि पर्यावरणाचे रक्षण करणारी आहे. आपल्या या दैदिप्यमान भारतीय संस्कृतीत असणारे विविध सण व उत्सव यामागे लपलेला मूळ गहन आशय लक्षात घेतला, तर अभिमानाने आपली मान ताठ होते. यात शंकाच नाही. समाजहिताच्या गोष्टी अगदी सहज, एकत्रितपणे, हसत खेळत व परस्पर सहकार्याने घडून याव्यात हीच व्यापक वैज्ञानिक दृष्टी तत्कालीन मान्यवरांची होती.
आता आजचे आपले वटसावित्रीचे व्रत बघा. हा सण वटवृक्षाचे पूजन करण्याचा आहे.. वटवृक्षच का निवडला पूजन करण्यासाठी ? तर या अश्वथ वृक्षाचे पर्यावरणीय महत्व अनन्यसाधारण आहे म्हणून. मानवाला नको असलेला कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेऊन आवश्यक असणारा प्राणवायू जास्त प्रमाणात हवेत सोडणारा हा वृक्ष आहे. त्याकाळी बहुतेक सगळे पायीच फिरायचे. मधेमधे विश्रांतीसाठी मग मोठी सावली देणारा वटवृक्षच हवा. मोठा वृक्ष म्हणजे पक्ष्यांचे हक्काचे आश्रयस्थानच असायचे. मग जास्त संख्येतील पक्षी मंजुळ किलबिल करत पांथस्थाला प्रसन्नतेची अनुभूती देत असत. ताजातावाना होत मग प्रवासी पुढच्या प्रवासाला निघायचा. जनावरेसुद्धा उन्हात,पावसात वटवृक्षाच्या आश्रयाला असायची. वटवृक्षाची खोलवर जाणारी मुळं जास्त पाणी धरून ठेवतात व जमिनीची धूप थांबते. याच्या पारंब्यांपासून पुन्हा आपोआप नवीन वटवृक्ष तयार होतात. म्हणून याला अमर वृक्ष असेही संबोधतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणारे हे अनेक वृक्ष त्या स्थानाला एक वेगळेच सौन्दर्य बहाल करतात. त्याचे पर्यंटनात देखील खूप महत्व आहे. त्याकाळी बहुतेक घरातच राहणाऱ्या स्त्रियांनी छान नटून थटून बाहेर पडावे , परस्परांशी मोकळा संवाद साधावा, आपल्या जोडीदाराच्या आयुष्यासाठी प्रार्थना करावी, प्रसन्न आणि उत्साहवर्धक वातावरण सभोवती अगदी सहजगत्या असावे असा छान दृष्टिकोन यामागे होता. प्राचीन आयुर्वेदातसुद्धा सांगितले आहे की या अक्षयवटाची पाने, चीक, मुळं,साल, पारंब्या वगैरेचा उपयोग पत्रावळीसाठी,समिधांसाठी, चेहऱ्यावरील कांतीसाठी, केशवर्धनासाठी, विषाच्या उताऱ्यासाठी, मधुमेहासाठी, ताप व जंत यावरील उपचारासाठी, खाज, रक्तस्त्राव यावर उपचार म्हणून केला जातो.
अशा अनेक गोष्टींचा साधक बाधक विचार करून अमर असणाऱ्या या वटवृक्षाला राष्ट्रीय वृक्ष म्हणून भारत सरकारने 1950 साली घोषित केले गेले.
आज गिनीज बुक मध्ये नोंद असलेला आंध्र प्रदेशातील कादिरी गावातील वटवृक्ष असून त्याचा विस्तार 19107 चौरस मीटर आहे. गुजरात मध्ये कबीरवड प्रसिद्ध असून त्याची उंची 95 फूट आहे.
त्या काळातील काही कहाण्या, काही प्रथा जर आज कालबाह्य वाटत असल्या तर त्यांचे स्वरूप आपण नक्कीच बदलू शकतो. पण त्या काळातील वाटसावित्रीचा मूळ आशय म्हणजे पर्यावरण रक्षण हा आजही महत्वाचा आहे हे सत्य आपण आजही नाकारू शकत नाही. म्हणून ठिकठिकाणी नवीन वटवृक्ष लावून त्यांचे संवर्धन करून दाखवावे हीच शिकवण हा वटसावित्रीचा सण देतो असे म्हणावेसे वाटते.
- चारुदत्त चौधरी
अ. भा. ग्राहक पंचायत, अमरावती
संवाद : 9420402122
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा