प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे
एक समर्पित व्यक्तिमत्व
लेखिका
• सौ चित्रा पुरुषोत्तम चौधरी
सिद्धिविनायक नगर अमरावती
मोबाईल क्र. ९६८९७२३७६५
१ जुलै 2025 अमरावतीचे आमचे जावई श्री नरेशचंद्रजी काठोळे यांना वाढदिवसाप्रित्यर्थ हार्दिक शुभेच्छा.
ध्येयपूर्तीचा वारकरी अशीच सर्व जादुगिरी अशा स्वभाव वैशिष्ठांनी या कोंदनात बसविलेल्या हिऱ्यासम जादुगार श्री नरेशचंद्र काठोळे सर्वप्रथम त्यांना वाढदिवसा प्रित्यर्थ उत्तम आयुरारोग्य
व शतायुष्य लाभो अशी शुभेच्छा अर्पिते.
कायम समाज हितासाठी धडपडणारे हे व्यक्तिमत्व एखाद्या अवलियागत वाटते. कारण ही आत्मियता, ओढ तळमळ त्यांच्या अंतकरणातून निर्माण झालेली आहे. मला आठवते त्यांच्या लग्नापासून म्हणजेच 20 जुलै 1979 पासून त्यांचा माझा संपर्क आहे. साधा सरळ उंच बांधा अशी शारीरिक ठेवण अमरावतीच्या श्रीमती केशरबाई लाहोटी संस्थेत जीवनावश्यक नोकरी पत्करून त्यांची सुरुवात मनात जिद्द आणि प्रयत्नांची पराकाष्ठा त्यामुळे जीवनात एक एक यशाचा टप्पा गाठत पुढे गेले. तशातच उच्चशिक्षित विद्याविभूषित साक्षात विद्याच जीवनात सहचारिणी म्हणून लाभली .त्यामुळे उत्कर्षाला भरारी आली. जेमतेम आर्थिक परिस्थितीवर मात करीत तिनेही त्यांच्या कष्टात प्रयत्नात जबाबदारीत कर्तव्यात खारीचा वाटा उचलला. ज्ञानदानाचे कार्य स्वीकारत अध्यापनाने प्राध्यापक होत संसार फुलविला. संसार वेलीवर पल्लवी व प्राची अशा दोन गोड लाघवी कन्यारत्नांचे आगमन झाले. समाजात मुलांविषयी असलेला आग्रह ग्राह्य न मानता अतिशय सन्मानाने आनंदाने मुलींवर संस्कार झाले .आज हेवा वाटावा गर्व वाटावा अशा कर्तबगार गृहिणीमध्ये त्यांच्या मुलींचा समावेश होतो. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
परिस्थितीने कसलेल्या गोरगरीब पण हुशार विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना मार्गदर्शनाच्या वाटेने यश शिखरावर पोहोचविण्याचे कार्य ते अविरत करीत आहेत. त्यात आर्थिक भार बरेचदा सोसण्याचे प्रसंग आलेत. त्यावर घरावर तुळशीपत्र ठेवले आहे. परंतु त्यांची आंतरिक तळमळ प्रयत्नांची जिद्द चिकाटी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे पुढे बी. एड., एम. ए. पीएच.डी
मिळविण्यापर्यंत शिक्षणाची पदव्यांची वाट ते चालत राहिले. व ते पूर्ण करण्याची जिद्दच त्यांना यशस्वी पथावर नेत आहे .नात्याने जरी मी त्यांच्या सासूबाईंच्या भूमिकेत असली तरी जावई माझा भला असेच मला प्रत्ययाला येते .जावई म्हणजे दशम ग्रह असा रूढार्थ असला तरी हा तेजाने ज्ञानाने कर्तुत्वाने जिद्दीने चकाकणारा तेजपुंज ग्रह म्हणावा लागेल.
सर्वांना प्रोत्साहन देणे हा त्यांचा स्थायीभाव आहे. ही स्तुती नव्हे तर वस्तुस्थिती आहे. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला त्यांच्या अस्तित्वाची प्रगतीची वाट दिसते. असा हा दीपस्तंभ समाजातील सर्वगुणी विद्यार्थ्यांना प्रकाश वाट दाखवीत त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य फुलविणारा देवदूतच ठरतो .स्वप्नात वाटणारे प्रथितयश जेव्हा या व्यक्तीच्या प्रयत्नाने ज्ञानाने मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांना सत्यात उपलब्ध होते तेव्हा त्यांचा जीवनाविषयीचा दृष्टिकोन हा सुखद व प्रेरणादायी ठरतो.
शेतकऱ्याचा मुलगा मुलगी सामान्य ड्रायव्हरचे अपत्य परिस्थितीने सामान्य असणाऱ्याचे मुलं मुली जेव्हा उच्च पदस्थ होतात तेव्हा अभिमानाने ऊर भरून येतो. पुण्यकार्य किंवा पवित्र कार्य याहून वेगळे ते काय असणार ?
निरनिराळ्या प्रांतात राज्यात या कार्यप्रणालीचे बीज पेरण्याकरिता शिबिरांचे आयोजन करणे .प्रत्येक संस्थेत जातीने हजर राहून समाजकार्यात सहभाग नोंदविणे .त्यासाठी दिवस-रात्र भटकंती करणे. हे नित्याचे झाले आहे .काठोळे सर कधी कुठे असतील याची निश्चिती नाही .कुठले संमेलन कोणती व्याख्यानमाला कधी आरोग्य शिबीर अशा विविध कार्यक्रमात त्यांची उपस्थिती कायम असते .उद्देश हाच की तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ व्हावा आणि परिस्थितीने दिलेल्या चटक्यांवर हळुवारपणे फुंकर घालून जीवनाचा आनंद घेता यावा. या उदात्त हेतूने प्रेरित होऊन मार्गक्रम पुढे चालता व्हावा .अशा या व्यक्तीला विविध सन्मान विविध पदव्या विविध क्षेत्रातील पदव्यांनी भूषित करण्यात आले आहे. त्यांच्या आचरणामध्ये डॉ. अब्दुल कलाम डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रसंत तुकडोजी महाराज श्री संत गाडगेबाबा यांच्या विचारांचा पगडा त्यांच्या मनावर खोल रोवल्या गेला आहे.अलीकडले मधुकर केचे कवी सुरेश भट यांच्या साहित्याच्या प्रभावामुळे त्यांच्यातला कवी फुलल्या गेला. श्री संत गाडगेबाबा यांच्या जीवनावरचे क्रांतीयोगी नाटक व डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जीवनावरील युगनिर्माता या नाटकाची निर्मिती झाली. साहित्याने त्यांच्या ७५ वी गाठली आहे. त्यांच्या स्वभावातील तळमळ म्हणजे सबके लिए खुला है मंदिर ये हमारा अशा वृत्तीने स्वतःचा बंगला स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी करिता देण्या इतपत परोपकार डोकावतो .वाचन संस्कृती वाढीस लागावी म्हणून त्यांच्या ग्रंथालय 24 तास विद्यार्थ्यांसाठी खुले केले.
आपले जीवन समाजासाठी वेचणाऱ्या या व्यक्तीने मृत्यूनंतरही सामाजिक बांधिलकी समाजाचे आपण काही देणे लागतो या विचाराने प्रेरित असताना स्वतःच्या आईचे देहदान करून कर्तव्याची पूर्ती केली .अशा या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाला वेग वेगळ्या संस्थांनी जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले. अलीकडे 26 जूनला पुणे येथे शाहू महाराज जयंती निमित्त शांतिदूत पुरस्कार मिळवून या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्या गेला. यादी खूप मोठी आहे .ती कागदात मावणारी नाही. साहित्याचा गाढा अभ्यास लिखाणाचा हव्यास दुसऱ्यांच्या भल्याचा ध्यास कुटुंबाचा श्वास अशा विविध गुणांनी नटलेलं हे 52 कशी सोनं आहे.
त्यांची साहित्य निर्मिती प्रचंड मोठी आहे. रोज किमान दोन लेख तरी लिहून झाले पाहिजेत अशी ही दिनचर्या आहे .वाचन लेखन चिंतन अशा पैलूंनी बसणारे हे व्यक्तिमत्व आहे. त्यांच्याविषयी भरभरून लिहिण्याजोगे आहे .पुनश्च एकवार त्यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा .उत्तम आयुरोग्यासोबत शता आयुष्याची ईश्वरचरणी प्रार्थना .
---------------------
१ जुलै 2025 श्री नरेशचंद्रजी काठोळे यांच्या वाढदिवसा प्रित्यर्थ हार्दिक शुभेच्छा. यांच्या वाढदिवसा प्रित्यर्थ हार्दिक शुभेच्छांचा कवितेचा अहेर.
ध्येयपूर्तीचा वारकरी
(कवितेचा अहेर)
दीनदलितांचा कैवारी
आय ए एस मिशनचा कारभारी
सान थोरांचा असे सहकारी
कर्तव्याची धुरा खांद्यावरी
गोरगरिबांचा सखा हरी
समाज ऋणांची जबाबदारी
ध्येयपूर्तीचा वारकरी
अशीच सर्व जादुगिरी
• सौ चित्रा पुरुषोत्तम चौधरी
सिद्धिविनायक नगर अमरावती
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा