आहार सुयोग्य असेल तर औषधांची
गरजच नाही
अकोला :
आहार जर सुयोग्य असेल तर औषधांची गरजच भासत नाही. एखादी व्यक्ती आजारी पडली तर त्याच्या कारणांमध्ये आहारविषयक चुका हे सर्वांत जास्त असण्याची शक्यता असते. त्यामुळे चिकित्सेच्या दृष्टिकोनातून विचार करायच्या आधी आहारीय बदल महत्त्वाचा ठरतो,असे डॉ. प्रमोद ढेरे, निसर्ग उपचार तज्ञ यांनी म्हटले आहे.
काय खावं, काय खाऊ नये, किती प्रमाणात खावं, जेवताना कसं बसावं, आहारात पदार्थ काय असावेत, त्यामध्ये किती रसांचा (कडू, तुरट, गोड, खारट, आंबट आणि तिखट अशा चवींना आयुर्वेदात रस असे म्हटले जाते.) समावेश असावा या गोष्टी यामध्ये येतात.
आपल्या शरीराचं वजन दोन प्रकारचं असतं- चरबीचं वजन आणि स्नायू - हाडांचं वजन. वजन काट्याकडे बघून स्वत : च्या प्रकृतीचा अंदाज बांधता येत नाही. आपल्या शरीरातल्या चरबीचं वजन किती आहे (शरीरात चरबीचं प्रमाण किती आहे) हे एकूण वजन किती आहे याच्यापेक्षा महत्त्वाचं असतं. एकूण वजनात चरबीच्या वजनाचं प्रमाण किती आहे हे पाहिलं जात नाही आणि आपण उगाच डाएट च्या मागे लागतो.
अतिरेकी डाएटच्या मागं कधीही लागू नका, त्यांचा फारसा उपयोग नसतो आणि ती पाळणंही अवघड असतं.सर्व खाल्लं पाहिजे. खाद्यपदार्थांवर 'दैवी','असुरी' असे शिक्के मारू नका, सर्व पदार्थ तुमच्यासाठी तेवढेच चांगले किंवा वाईट असतात. प्रत्येक व्यक्ती जशी वेगळी असते, तसं प्रत्येक व्यक्तीचं डाएटही वेगळं असलं पाहिजे. दुसऱ्या कुणाचं तरी डाएट, व्यायाम याचं अनुकरण करू नका. लो-फॅट किंवा शुगर फ्री पदार्थांत नेमकं काय असतं ते माहीत करून घ्या.
तसे सगळेच पदार्थ आरोग्यदायी असतात, असं नाही आणि ते (कधीही) प्रमाणाबाहेर खाऊ नका. व्यायामाला पर्याय नाही. कितीही चांगली आहारपद्धती असली, तरी व्यायाम केल्याशिवाय हवा तो परिणाम साध्य करता येणार नाही. कधीही डाएटवर जाऊ नका त्याऐवज्जी जीवनशैली बदला. डाएटिंग म्हणजे उपासमार नव्हे वजन कमी करायचं असेल किंवा शरीराची झीज भरून काढायची असेल तर खाल्लं पाहिजे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा