• चुलीला आवतन..
: लेखिका :
राधिका (माजगावकर) पंडित.
संवाद : 8451027554.
चुलीला आवतन.... नवल वाटलं ना वेगळं नांव वाचून ? अहो! सगळ्या घरादाराला म्हणजे बाळगोपाळांपासून वृद्धांपर्यंत अगदी सगळ्या फॅमिली मेंबरना लग्नाच्या जेवणाचं आमंत्रण आहे बरं का हे! ह्या आमंत्रणात बडेजाव नाही. मानपान नाही तर या दोन शब्दातच अगत्य आणि आग्रह सामावलेला असायचा.
भुसावळच्या रेल्वे नॉर्थ कॉलनीत आम्ही रहात होतो, त्या एरियाला 40 बंगला म्हणायचे. साध्यासरळ खानदेशी भाषेतली लोकं माझ्या मुलांना विचारायची 'आरं तु चाळीस बंगल्यातला कां रं ?' मुलांच्या डोळ्यात भल्या मोठ्या तब्बल 40 बंगल्यात रहात असल्याचं स्वप्न तरळायचं आणि तो बालचमू खुशीने होकारार्थी मान डोलवायचा. चार हजारच्या वर वस्ती झाली तरी तो '40 बंगला' नांव घेऊनच अबाधित राह्यला.
कायम लक्षात राह्यलं ते कॉलनीच्या बाहेरच 'कंडारी गाव' आणि गावातलं ढोल ताशातलं ते लग्न. वराती पुढे बेफाम नाचून, मुहूर्त टाळून नवरदेवाचे ते खट्याळ मित्र मंडळ, भटजींना ताटकळत ठेवून, नवरीला "पाहू रे किती मी वाट" म्हणून वाट पाहायला लाऊन, भर उन्हात घामानं निथळत नाचून नाचून न्हाहून निघायचं.
अक्षतांचा मारा झाला, शुभमंगल सावधान झालं की, गर्रकन वळून मंडळी जेवणाच्या हॉल कडे जीव घेऊन पळत सुटायची, पडत धडपडत पट्टीवर आपलं बुड आदळायची. पट्टी म्हणजे लांबलचक सतरंजीचा पट्टा हो!
लग्न झाल्यावर पुणेरी भाषेतल्या मला, या खानदेशी 'पट्टी' शब्दानी चांगलाच हिसका दाखवला होता. ती मजेशीर कथा नंतर सांगणारच आहे. तहान भुकेनी कासावीस झालेले, उशीर झाल्याने भुकेचा डोंब उसळलेलं वऱ्हाड, अगदी बाया पण पानावर बसल्या की, पुरुष मंडळी गरमागरम मसालेदार तर्रीssदार वांग्याच्या भाजीच्या, वरणाच्या बादल्या घेऊन पुढे पुढे सरकायची. पाठोपाठ वाफाळलेल्या बट्टीची तापलेली परात घेऊन आलेला एखादा पैलवानगडी ओरडायचा, "अप्पा अवो बट्ट्या चुरा की, मागनं वरण आणि गावरानी तूप येतंय." लगेच बचकभर रंगीबेरंगी मोकळी बुंदी पण पानात पडायची. वाढणाऱ्याचा वेग विजेला लाजवील असाच असायचा. गरम गरम जेवणाच्या वाफेनी आधीच घामाघुम झालेला जेवणारा, पोटातल्या कावळ्यांना शांत करण्याकरता बट्टी दोन्ही हाताने कुस्करायचा.
मी पुणेकरीण असूनही नंतर ह्या अगत्याच्या सहभोजनात तरबेज झाले होते. पण एखादी मुंबईकरीण ह्या वातावरणानी, उकाड्याने, आणि ह्या बट्टी चुरणे प्रकरणांनी कमालीची गोंधळून जायची. आता ही बट्टी कांद्यासारखी फोडायची की तुकडे मोड करायची या प्रश्नाने भांबावलेला तिचा चेहरा आणखीनच बावळट व्हायचा. त्यातून वरणवाला पहाडी आवाजात ओरडायचा, "ओबाई बट्टी चुराकी, वरण कुठे वाढू? अहो ताई तुकडे नका मोडू तुकड्यावर वरण वाढल्यावर पत्रावळीवर तापी नदीच उतरल की वो".
त्याच्या ओरडण्यांनी आणखीनच भेदरलेल्या तिच्या डोळ्यात पाणी तरराळायचं. आणि मग ते बघून एखादी पोक्त मावशी डोक्यावरचा पदर सावरत पुढे व्हायची. हो, इतक्या जीवघेण्या उकाड्यातही म्हातारीचा डोक्यावरचा पदर ढळायचा नाही बरं का! वरण वाल्या समोर कमरेवर हात ठेवून हात नाचवत ती मावशी म्हणायची, "इतकी घाई कशापायी रं? वरणाची बादली पेलवना कां तुला? हाता पायापेक्षा तोंडात बराच जोर आलाय तुज्या? वरडतोस कशापायी, मुंबईकरीण नवीन हाये, प्रेमाने सांग की, प्रेमाने वाढ, आण ती बादली हीकडं." आता मावशीच्या पुर्षी आवाजातल्या दरडावणीला घाबरून पोरगं वरणाची बादली तिथंच ठेउन पळ काढायचं.
मावशीबाय पोरीच्या पानापुढं फतकल् मारून तांडा मांडा घालून बट्टी बारीक कुस्करायची. एक तुकडा पोरीच्या हातात ठेवून म्हणायची, "आता ह्यो तुकडा तू चुरुन बग, पुढच्या वक्ताला तरबेज झाली पाह्यजेस."
आता कुठे त्या पोरीच्या डोक्यात प्रकाश पडला, बट्टी चुरायची म्हणजे बारीक करायची असते. पुढे झालेल्या तिला म्हातारी म्हणाली, "सवय कर आमच्या गावच्या जेवणाची. कुनी सांगावं, हिंतच तुझा 'शेर' आसल. एखादं पोरगं तुला 'हेरल' आणि मुंबईवरून इकडे खानदेशात पळवून आणल." आणि काय सांगू, पोरगी चक्क लाजली की हो! ते पाहून तरुण पोरं चेकाळली.
बट्टीच्या चुऱ्याचं 'आळं' करून त्या द्रोणात वरणाचं 'ओघळार' ओतून प्रेमाने त्यावर तुपाची धार मावशी बायनी सोडली, आणि मग पोटात भुकेचा डोंब उसळलेल्या त्या मुंबईकरणीने दाल बट्टी वर आडवा हात मारला.
आता पुढची गंमत तर ऐका, योगायोगाने बोला फुलाला गांठ पडून मावशीबायच्या नातवाने तिला हेरली आणि वडीलधारी व मुलगा मुलगी पसंती होऊन त्याच मांडवात साखरपुडा ही झाला. मुंबईची गाडी खानदेशकडे वळली. अशा प्रकारे मुंबईची कोळीण, खानदेशाची 'लेवा पाटलीण' झाली. पुढे धोरणी मावशीबायने नातवाला, सुनेला पिठाची गिरणी काढून दिली. आता मुंबईकरीण बट्टी चुरण्यात काय, खाण्यात काय, दाल बट्टीचे रवाळ पीठ दळून देण्यात इतकी तरबेज झाली की आख्खं 'कंडारी' गांव तिला दालबट्टीवाली मुंबईकरीण म्हणून ओळखू लागलंय. अशा प्रकारे योगायोगाने दाल बट्टी कथा कुठून कुठे पोहोचली. पुढे कामगार गडी ठेवून तिने दोन गिरण्याही काढल्या.
तुम्हीच आता खानदेश दौरा काढा आणि ह्या चविष्ट, सणकून भूक लागल्यावर दणकून खायच्या अशा 'दालबट्ट्या' खायला खानदेशात नक्की जा. तिथे तुमचं अतिशय अगत्याचं, प्रेमाचं, आग्रहाचं भरपेट जेवण नक्कीच होईल. त्या खानदेशी आग्रहाला धन्यवाद देऊनच तुम्ही बाहेर पडाल. हे अनुभवाचे बोल आहेत. ह्या खानदेशी खासियत ला दाद दिल्याबद्दल तुमचें ही आभार मंडळी.
©® राधिका (माजगावकर) पंडित
सिंहगड रोड, पुणे, 8451027554.
(आवडल्यास सामायिक करतांना कथेत कुठलाही बदल न करता मुळ लेखिकेच्या नावासहच सामायिक करा ही विनंती.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा