लाज, वाटली पाहिजे!
लेखक - नारायण रा. खराद
संवाद : 8805871976
'लाज' हा जसा स्त्रियांचा अलंकार, संस्कार आहे, तसा पुरुषांचाही. प्रत्येकाला 'लाज' ही वाटलीच पाहिजे. 'लाज' ही एक मर्यादा आहे. कोणतीही मर्यादा ओलांडताना लाज वाटली पाहिजे. कोणतेही लाजिरवाणे कृत्य आपल्या हातून घडू नये, ह्याची सदैव काळजी घेतली गेली पाहिजे.
लाज सोडलेली अनेक माणसे अनेक ठिकाणी दिसतात. तेव्हा तोंडून शब्द बाहेर पडतात, 'लाज वाटली पाहिजे!' लाजने गरजेचे आहे. लाज हा संस्कार आहे, संवेदना आहे. एकदा लाज सोडली की बाकी आपोआप सुटते. आपली कुणाला लाज वाटेल, इतके लाजिरवाणे असू नये.
लाज बाळगणारी माणसे कोणतीही गोष्ट विचारपूर्वक करतात. स्वत:च्या स्वार्थासाठी किंवा फायद्यासाठी लाज सोडणारी माणसे कवडीमोल असतात. स्वाभिमान नसलेली ही माणसे कणा नसलेली असतात. अपमान म्हणजे काय हे त्यांना कळत नाही. अशा लोकांना कशाचीही लाज वाटत नाही.
सर्व बेजबाबदार लोकांना लाज वाटली पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणाऱ्या लोकांना लाज वाटली पाहिजे. आपले जे कृत्य इतरांना त्रास देते, ते कृत्य करताना लाज वाटली पाहिजे.
स्वतःच्या फायद्यासाठी इतरांचा बळी देणे, त्यास दगा देताना लाज वाटली पाहिजे. कोणताही कामधंदा न करता खातांना लाज वाटली पाहिजे.
दिसेल त्या स्त्रीकडे वासनांध दृष्टीने बघण्याची लाज वाटली पाहिजे. आईबापाच्या पैशांची मुक्त उधळण करण्याची मुलांना लाज वाटली पाहिजे.
दिवसभर राबणाऱ्या नवऱ्याला दोन वेळेचे जेवण वेळेवर न देणाऱ्या बायकोला लाज वाटली पाहिजे. सरकारी गडगंज पगार असताना, सामान्य, गरीब लोकांना लूटणाऱ्या सरकारी नोकरांना लाज वाटली पाहिजे.
आज समाजाला लाज वाटणाऱ्या लोकांची खूप गरज आहे. 'लाज' स्वतःला लावलेली शिस्त आहे, तो एक सदाचार आहे. विद्यार्थी दशेत अभ्यास न करता, उनाडक्या करताना लाज वाटली पाहिजे. आई बापाला न जुमानता लफडी करणाऱ्या मुलींना लाज वाटायला पाहिजे. तोकडी वस्त्र वापरताना, स्वैराचारी तरुणींना लाज वाटली पाहिजे.
सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या, रस्त्यावर मुतणाऱ्या लोकांना लाज वाटली पाहिजे. उघड्यावर चाळे करणाऱ्या आशिकांना, बायांना घुरणाऱ्या लोकांना लाज वाटली पाहिजे.
विद्यार्थ्यांना नक्कल करताना, मुलांचा हुंडा घेताना, स्वतःचेच घर भरणा़ऱ्या नेत्यांना, लग्नाआधी किंवा नंतर पळून जाणाऱ्या पोरींना लाज वाटली पाहिजे.
विवाहित असून स्वयंपाक न येणाऱ्या बायकोला, घरकामाचा कंटाळा असलेल्या बायकोला लाज वाटायला पाहिजे.
समाजातील सर्वच घटकांना लाज वाटण्याची गरज आहे. आज सर्वत्र लाज सोडलेली माणसे दिसत आहेत. कोणतेही चुकीचे वर्तन हे लाजिरवाणे असते, त्याची जर लाज बाळगली तर ते घडणार नाही. ज्या गोष्टीची लाज वाटली पाहिजे, त्या गोष्टीची ती वाटलीच पाहिजे. मग ती फुकटचे खाण्याची असो की चोरी करण्याची असो.
जो जितका लाजतो, तो तितका सुसंस्कृत.
(योग्य वाटल्यास सामायिक करतांना लघुलेखात कुठलाही बदल न करता मुळ लेखकाच्या नावासहच सामायिक करा ही विनंती.)
ooooo
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा