वृक्षतोड, भक्ष्य व पाण्याचा अभावामुळे वन्यप्राणी मानवी वस्त्यांकडे धाव घेऊ लागले आहेत. मूर्तिजापूर भागात वन्यप्राण्यांची संख्या नसल्यासारखीच आहे. यद्यपि, एक बिबट्या सध्या जामठी गावात भक्ष्य मिळविण्यासाठी जनावरांवर हल्ले करू लागला आहे. जामठी गावात बिबट्याची दहशत काल रात्रीपासून पसरली आहे.
काल रात्री रात्री १.३० च्या सुमारास दोन पाळीव जनावरांवर बिबट्याने हल्ला चढविला यावर वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे.
बेसुमार जंगलतोड व अवैध शिकारीमुळे एकीकडे वाघ, सिंहासारखे मार्जार कुळातील हिंस्त्र श्वापदे झपाट्याने कमी होत असताना याच कुळातील बिबट्याने मात्र आजही आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे. मुळातच अतिशय चाणाक्ष, बुध्दिमानी व संधिसाधू स्वभावाचा बिबट्या, असेल त्या परिस्थितीशी, वातावरणाशी जुळवून घेण्यात तरबेज मानला जातो. तो अगदी हिमालयातील बर्फाळ प्रदेशापासून ते थेट समुद्र किनारपट्टीपर्यंत हमखास आढळून येतो. सहसा दाट झाडी-झुडपात लपून -छपून जीवन जगणारा बिबट्या अत्यंत ‘छलिया शिकारी’ समजला जातो.
मिळेल त्या परिस्थितीत मिळेल ती शिकार करण्याचं कसब अंगी भिनलेले बिबटे जंगले नष्ट झाल्याने मोठ्या प्रमाणत विस्थापित होत आहेत. पोटाची भूक शमविण्यासाठी पारंपरिक शिकार मिळत नसल्याने ते साहजिकच मानवी वस्त्यांकडे आकर्षिले जात आहेत. मानवी वस्त्यांत येऊन मिळेल त्या भक्षाची शिकार करताना त्यांचा जगण्यासाठीचा संघर्ष आता आणखी कठीण होत चालल्याची लक्षणे स्पष्ट दिसू लागली आहेत.
सध्या अशाच एका बिबट्यांनी मुर्तिजापूर तालुक्यातील जामठी या गावात ठाण मांडले असून, पारंपरिक शिकार मिळत नसल्याने या परिसरातील पाळीव प्राण्यांपाठोपाठ त्यांनी माणसांवरही हल्ले सुरू करेल याची शक्यता नाकारता येत नाही.
या मुळे जामठी व आजूबाजूचा गावात सध्या लोक खूप घाबरले आहेत. तरी वन विभागाने पंचनामा केले असून तातडीने या बिबट्याचा शोध घ्यावा, अशी मागणी गावकरी करीत आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा