कवडसा... (प्रस्तुत लेखक हे प्रसिद्ध स्तंभलेखक, शिक्षण तज्ञ असून त्यांच्या सावित्री फाउंडेशन,अकोलाच्या माध्यमातून सक्रिय सामाजिक, शैक्षणिक कार्य करतात.)
कवडसा
"नकारात्मकता दूर होते..."
लेखक
प्रा.डॉ. मोहन खडसे
अकोला
संवाद : 9823289010
ईमेल: mvkhadse9@gmail.com
माणसं नकारात्मक झाली म्हणजे त्यांना सगळंच काही वाईट दिसतं .चुकीचं दिसतं .नको ते दिसतं. मात्र जे पाहायला पाहिजे ते मात्र त्यांना दिसत नाही कारण दृष्टी नकारात्मक झालेली असते. लोक आजकाल एक दुसऱ्याला मदत करत नाहीत , नातेसंबंधातील प्रेम , विश्वास , सहकार्य आणि श्रद्धा कमी कमी होत आहे ,कुणी कुणाची काळजी करत नाही, वगैरे - वगैरे ,अशी मते काही लोक व्यक्त करत असतात. मात्र त्यांच्या लक्षात येत नाही की त्यांना हवं ते सगळं- सगळं आजही आहे, आपल्या आसपास आहे मात्र ते आपल्याला ' दिसत ' नाही एवढेच. आपण लोकांशी कसे राहतो हे लक्षात न घेता, लोकं लोकांशी कसे राहतात हे लक्षात घेतलं जातं आणि त्यातून माणसाची नकारात्मक होती तयार होते. ' दिखता है तो बिकता है ' या तत्वानुसार माणूस जे दिसतं त्यालाच फक्त खरं मानत जातो आणि मग त्याला मूळ मुद्दा, मूळ रचना , मूळ भावना लक्षात येतच नाही. खरंतर तो त्याचा दृष्टी भ्रम झालेला असतो पण तो भ्रम झाला आहे हे त्यालाच कळत नाही तर मग उपाय तो काय ?
खरं म्हणजे दिसतय ते खोटं नसतं मात्र खरंच असेल कशावरून ? मराठीत एक म्हण आहे - ' दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं . ' मग हळूहळू माणसाला सवय लागते ती फक्त डोळ्यांवर विश्वास ठेवण्याची ! माणसाने डोळ्यावर विश्वास ठेवू नये असं नाही मात्र त्यांनी आपल्या बुद्धीचाही वापर करावाच की नाही ?
माणसाचं नकारात्मकता येण्याचे एक कारण आहे. ती नैसर्गिक आहे. ते असं की सर्वसाधारणपणे माणूस कुठल्याही, क्षणी कुठल्याही प्रसंगात माणूस हा नकारात्मकते कडे झुकण्याची शक्यता अधिक असते. सकारात्मकता त्याच्यात असते मात्र ती काहीशी बाजूला असते. ती मुद्दाम ओढून मनात आणावी लागते म्हणजे माणूस संतुलित होतो हे मात्र खरं. मानसशास्त्रज्ञांनी प्रयोग केला ज्याला त्यांनी नाव दिलं मिसिंग टाइल्स फिलॉसॉफी ! याचा वापर उद्घाटनाच्या दिवशी करण्याचं मानसशास्त्रज्ञांनी ठरवलं. खरं म्हणजे या सगळ्या प्रकारामध्ये त्यांना माणसाची नकारात्मकता व्यक्त करायची होती. प्रयोग यशस्वी झाला. याचं कारण असं आहे की लोकांना एकूणच हॉटेल सुंदर दिसलं नाही मात्र एका ठिकाणी टाइल्स बसवायची राहिली असं त्यांनी बोलून दाखवलं. काहींनी तर त्यांच्या दृष्टिकोनाचं ,त्यांच्या निरीक्षणाचं कौतुक केलं . हेच शास्त्रज्ञांना अधोरेखित करायचं होतं.
कुठल्याही गोष्टीत कमतरता शोधणं, पाहता क्षणी चुका काढणं, दोष काढून नावं ठेवणे ,ही माणसाची जन्मजात वृत्ती असते की काय ,अशी शंका येणं साहजिक आहे. पण ती काहीशी असते हे खरं आहे. काही वेळेला माणसाला नकारात्मकतेची सवय होते ती अशी की माझ्याकडे अमुक नाही, माझ्याकडे तमुक नाही, मलाही मिळालंच नाही, मला हे मिळायला हवं होतं त्याच्याकडे बघा किती छान आहे, माझ्याकडे नाही वगैरे - वगैरे. पण एक मात्र खरं ते असं की सगळ्यांच्याच जगण्यामध्ये काहीतरी खूप चांगलं आहे ते त्यांना जाणवायलाच पाहिजे आणि ते जाणवलं म्हणजे सगळं किती सुंदर होतं या शंका असतील काय ?
बुद्धी आणि मनाचा संघर्ष माणसाचा तसा नवा नाही. बुद्धी एक म्हणते तर मन दुसरं म्हणते. मात्र मनाचेही तेवढेच महत्त्व आहे जेवढे बुद्धीचे आहे. बुद्धीने मनाला नियंत्रित केलं, काबुत ठेवलं तर ते सगळ्याच गोष्टींसाठी चांगलं राहतं. मात्र काही वेळेला काही क्षणांना, मनाला मोकळीक दिलीच पाहिजे या शंकाच नाही. ज्या परमेश्वराने माणसाचे शरीर निर्माण केले त्या शरीरात मात्र त्याने हृदय म्हणजे मन खाली ठेवलं आणि बुद्धी वर ठेवली म्हणजेच बुद्धी अधिक श्रेष्ठ राहावी, असं त्यालाही वाटत असावं. कायद्याचे पालन करताना मनाचा प्रश्नच येत नाही. संविधानाचे पालन करत असताना मनाचा कुठे प्रश्न येतो ? माणसाने त्याच्या मनापेक्षा बुद्धीला अधिक श्रेष्ठ दर्जा दिला पाहिजे मात्र प्रत्यक्षात दिला जात नाही.माणूस मनाला, त्याच्या विचारांपेक्षा अधिक महत्त्व देतो मग इथेच फसगत होऊ शकते.स्वत:ची सुद्धा दृष्टी माणसाला असावीच.यासाठीच की काय सुप्रसिद्ध शायर साहिर लुधियानवी लिहीतात --
ले दे के अपने पास
फकत इक नजर तो है
क्यूं देखें जिन्दगी को
किसी की नजर से हम
(प्रस्तुत लेखक हे प्रसिद्ध स्तंभलेखक, शिक्षण तज्ञ असून त्यांच्या सावित्री फाउंडेशन,अकोलाच्या माध्यमातून सक्रिय सामाजिक, शैक्षणिक कार्य करतात.)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा