(प्रस्तुत लेखक हे प्रसिद्ध स्तंभलेखक,शिक्षण तज्ञ असून त्यांच्या सावित्री फाउंडेशन, अकोला च्या माध्यमातून सक्रिय सामाजिक, शैक्षणिक कार्य करतात.)
" ऋतूचक्र........."
लेखक
प्रा.डॉ. मोहन खडसे, अकोला
संवाद : 9823289010
ईमेल: mvkhadse9@gmail.com
कोण कसा असेल सांगता येत नाही. कुणाला कोणती गोष्ट आवडेल अन् आवडणार नाही , हेही सांगणं तसं कठीणच आहे. आता ऋतूचंच घ्या ना. एखादा ऋतू एखाद्याला आवडत नाही मात्र बाकीचे आवडतात , असं सर्वसाधारण दिसतं. तसं पाहिलं तर कोणताही ऋतू वाईट नाही , खराब नाही. कदाचित फायद्याचा नसेल पण तो आवश्यकही आहे , हे माणसाला जाणवायलाच पाहिजे. पण काहींना काही ऋतूंचा कंटाळा येतो म्हणा किंवा नकोसे असतात असेही म्हणा. तसं पाहिलं तर प्रत्येक ऋतूमध्ये खूप काही चांगलं असतं ,अर्थात जाणण्याचा प्रयत्न केला तर !
भर उन्हाळ्यात कोणी जर थंडगार पाणी आणि जमलंच तर लिंबू सरबत दिलं ,तर बरं वाटतं की नाही ? पावसाळ्यामध्ये रिमझिम पाऊस पडत असताना ओलं होऊ, या भीतीने कुठेतरी थांबलं अन् तेवढ्यात एक चहाची टपरी दिसली.तेथे असलेल्या दुकानदाराला काय म्हणावं बरं ? म्हणावं छान गरमागरम भजे - पकोडे काढ अन् आल्याचा चहा दे. मनात विचार करावा - हे सगळं खाणं होईपर्यंत पाऊस थांबेलच की. हिवाळ्यात भाजीपाला किती छान असतो हिरवागार आणि ताजा. जेवण किती छान जातं. जेवणाचा आनंद येतो. तो घ्यावा की नाही ? जेवढे पैसे आहेत तेवढ्यात तर घ्यावाच. जेव्हा जसं शक्य होतं तसं, अशा पद्धतीने ऋतूचा आनंद घेता येतोच यात शंकाच नाही. कोणत्याही ऋतू बद्दल कुरकुर करायची नसल्यास !
जसे हवामानाचे ऋतू असतात तसेच माणसाच्या जगण्याचेही असतात. माणसं आवश्यकतेनुसार जगण्याचे ऋतू ठरवतात. स्वतःच्या आवश्यकतेनुसार, गरजेनुसार हे ऋतू माणूस ठरवतो म्हणून तर जगण्याच्या लहान सहान अडचणी निर्माण करून टाकतो. माणूस जसा प्रत्येक हवामानाच्या ऋतूमध्ये सर्वच गोष्टींची काळजी घेतो अन् त्यानुसार राहतो तसंच या जगण्यातल्या ऋतू बद्दल ही राहलंच पाहिजे की नाही ? या ऋतू बद्दल प्रत्येकाचे मतं वेगवेगळे असू शकतात. काही माणसं ही ऋतूप्रमाणे राहतात बदलतात त्यांना ओळखणं आवश्यक असतं. यामुळेच की काय कुठेतरी वाचलं होतं -
पतझड में ही रिश्तों की
परख होती है
बारीश में तो
हर पत्ता ही हरा दिखता है
खरं म्हणजे माणसाचे जगणे म्हणजे एक प्रकारचे शिक्षणच आहे. एक कथा वाचण्यात आली ती अशी - एका गुरुने आपल्या शिष्यांची परीक्षा घेण्यासाठी गुरुकुलच्या मार्गावर भरपूर काटे टाकून ठेवले. त्यांना म्हणाले की उद्या सकाळी तुम्ही गुरुकुल मध्ये यावं तुमची परीक्षा घेणार आहे. तीनही शिष्य सकाळी निघाले. ते कमजोर निश्चितच नव्हते. काटे पोचत असले तरी पहिला शिष्य अखेर पोहोचला. दुसराही पोहोचला पण त्याला एक काटा बोचलाच. तिसरे शिष्याने मात्र काट्यांच्या फांद्यांना ओढत दूर फेकून दिले आणि लगबगिने गुरुकुलकडे पोहोचला. पहिल्या आणि दुसऱ्या शिष्याला गुरु म्हणाले की तुम्ही दोघेही सध्या फक्त प्राणी आहात मनुष्यप्राणी व्हायचे आहात म्हणून तुमचे शिक्षण आणखीन काही दिवस होणार. तिसऱ्या शिष्याला पाहताच गुरु म्हणाले , " तू माझ्या परीक्षेत उत्तीर्ण झालास. ज्ञान तेच आहे हे व्यवहारांमध्ये कामी येईल. व्यवहार समाजात व्यवहार करताना असे राहा की लोकांनी टाकलेले काटे तुम्हाला बोचायला नकोत आणि तुम्ही सुद्धा कुणाला तुमचे काटे बोचू देणार नाही....."
माणसाची योग्यता ही जर शिक्षणाने - वयाने ठरत असती तर फक्त काहीच माणसं यामध्ये उत्तीर्ण झाली असते. बाकीचे सगळे नापास झाले असते. असं मात्र कधी होत नाही. सर्वच प्राण्यांना आपापले संरक्षण अन् हित साध्य करण्याची बुद्धी असते मात्र माणसाला त्याच्या आसपासच्या सर्वच लोकांचे हित साधण्याची, काळजी घेण्याची बुद्धिमत्ता असते. मात्र माणूस हा फक्त प्राण्यांसारखा राहायला लागला की काय अशी शंका येते. म्हणूनच की काय माणसाला भेदभाव करण्याची ,आपले - परकीय करण्याची बुद्धी असते आणि तिथेच त्याचा ' घात ' होण्याची शक्यता निर्माण होते. कथेतील पहिल्या व दुसऱ्या शिष्यासारखं माणूस करण्याचा प्रयत्न करतो मात्र सगळेच काटे तो बाजूला करत नाही म्हणून काही काटे तर त्याला निश्चितपणे बोचणार असतात, यात शंकाच ती काय ? पण त्यातूनही वाचता येतं अन् शक्यतो इतरांनाही वाचवता येतं , हेही तितकच खरं आहे. काही काटे बोचणार म्हणून माणसाचं जगणं कधी खराब होतं का ? माणसाचा सकारात्मक आणि खरेपणा जाणण्याचा दृष्टिकोन असलाच पाहिजे. सुप्रसिद्ध शायर शमीम किरहानी शेरमध्ये म्हणतात-
काटों से गुजर जाना
दुश्वार नही लेकिन
काटें ही नही यारो
कलियां भी हैं राहो में
प्रा. मोहन खडसे, अकोला.
संवाद : 9823289010
ईमेल: mvkhadse9@gmail.com
(प्रस्तुत लेखक हे प्रसिद्ध स्तंभलेखक,शिक्षण तज्ञ असून त्यांच्या सावित्री फाउंडेशन, अकोला च्या माध्यमातून सक्रिय सामाजिक, शैक्षणिक कार्य करतात.)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा