क्रांतिकारी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
लेखक
- प्रा.शरद पुसदकर, संवाद : 9423608651
अण्णाभाऊ साठे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाटेगाव ह्या खेडेगावात ०१ ॲागस्ट १९२० रोजी झाला.त्यांचे मुळचे अप्रचलीत नांव 'तुकाराम' असे होते.त्यांच्या वडीलांचे नांव सिधोजी व आईचे नांव बालबाई होते.त्यांचा जन्म तत्कालीन समाजाने गावकुसाबाहेरील अत्यंत मागास व अस्पृश्य ठरविलेल्या मातंग जातीत झाला होता. त्याकाळी गावातील सर्वात हीन समजल्या जाणारी कामे मातंग जातीच्या लोकांना करावी लागत.अण्णाभाऊंच्या घरची परिस्थिती अत्यंत गरीब व जीवन कष्टप्रद असे होते.
अण्णाभाऊंचे वडील कुटुंबासह १९३१ साली दुष्काळामुळे पोटासाठी कामधंदा शोधण्यासाठी मुंबईस आले.त्यांच्या वडीलांना मोरबाग गिरणीत मजूराचे काम मिळाले.त्यांच्या पाठोपाठ अण्णाभाउ सुद्धा कुटूंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी मिळेल ती कामे मुंबईत शोधू लागले.त्यामुळे मोरबाग गिरणीत झाडझूड करणे ,फेरीवाल्यांची ओझी वाहणे,गाडीतून पडणारे कोळसे वेचणे ई.कामे ते करू लागले. ह्यातूनच त्यांनी मजूरांच्या हलाखीच्या जीवनाचा स्वतः अनुभव घेतला. तसेच ते मजूरांचे संप,मोर्चे आदि संघर्ष, आंदोलनातही ते सहभागी झालेत. अशातच १९३६ मध्ये डाॅ श्रीपाद अमृत डांगे यांच्या संपर्कात आल्यावरअण्णाभाऊंवर कम्युनिस्ट चळवळीचा प्रभाव पडला.व ते एक सक्रीय 'काॅम्रेड' झाले.
त्यांची वाचन व लेखनाची ऊर्मी त्यांना काही स्वस्थ बसू देईना. ते त्याकाळात डाॅ. आंबेडकरांपासून सावरकरांपर्यंतची मुंबईतील भाषणे लक्षपूर्वक ऐकूण त्यांचा अभ्यास करू लागले. पुढे वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर कुटूंबाची सगळी जबाबदारी येऊन पडली. ते गावी परतून मावसभावाच्या तमाशाच्या फडात काम करु लागले.१९४२ च्या चळवळीत सहभागी झाल्याने ब्रिटीश सरकारने त्यांच्याविरूद्ध पकड वारंट काढला. पोलिसांना चुकवीत ते पुन्हा मुंबईला आले. लोकशाहीर अमर शेख यांचे सोबत ते शाहिरी करू लागले. त्यांचा 'स्टॅलिनग्रांडचा पोवाडा'१९४३ साली 'पार्टी'ह्या मासिकात प्रसिद्ध झाला.नंतर अमर शेख व गव्हाणकर यांचे मदतीने 'लालबावटा कलापथक' स्थापन केले.
तेथून झपाट्याने त्यांनी कथा,कादंबर्या पोवाडे, वगनाट्य,आदि प्रचंड साहित्य लैखन केले. त्यांचे १३ कथासंग्रह, ३३कादंबर्या,१३कविता-गीतसंग्रह,१४वगनाट्ये,कलापथके,१५प़ोवाडे,लावण्या,१ प्रवास वर्णन,३नाटके ७ चित्रपट कथा असे विविधांगी साहित्य प्रकाशितअसून त्यांच्या (आधी सांगीतल्या त्या) केवळ सुप्रसिद्ध 'फकिरा' ह्याच कादंबरीवर नव्हे तर तब्बल ७ मराठी कादंबर्यांवर सिनेमे निघाले आहेत. त्यांच्या साहित्याचे भारतीय तसेच जगातील २७ भाषांत भाषांतरे झालेली आहेत. त्यांचे लेखन जीवनाभिमुख व अस्सल अनुभवांवर आधारीत असल्याने लोकप्रीय होते. ते दलीत साहित्य संमेलनाचे(१९५८ मध्ये)उद्घाटक होते.
खेदाची बाब अशी कि त्यांच्या वास्तववादी, कसदार,विविधांगी,विपूल अशा साहित्य निर्मितीची मराठी सारस्वताने,समीक्षकांनी दखल घेतली नाही,की कोणत्याही अ.भा. मराठी साहित्य संमेलनात त्यांचा गौरव करण्यात आला नाही.किंवा त्यांच्या लेखनाबद्दल साधा गौरवोद्गार काढण्यात आला नाही.
त्यांना ईंडोकल्चरल सोसायटीद्वारे रशियात आमंत्रित करण्यात आले. लोकांच्या आर्थिक साहाय्याने तेथे जाऊन आल्यानंतर त्या प्रवास वर्णनात तेथील समाज व्यवस्था व समताधिष्ठीत जीवन पद्धतीबद्दल ते भरभरून स्तुतीपर लिहतात.
गव्हाणकर,आर.बी. मोरे यांच्यासोबत ते CPM चे सक्रीय सदस्य म्हणून दीर्घकाळ मुंबईत काम करीत होते. त्यांची महात्मा फुले, शाहु आंबेडकरांच्या कार्यावर श्रद्धा होती. नितांत आदर होता.त्यांनी आपली सर्वात प्रसिद्ध कादंबरी 'फकिरा' ही डाॅ. आंबेडकरांच्या समाज क्रांतीस अर्पीत केली होती.त्यांनी मराठीच्या प्रेमाने संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात आपल्या शैलीने प्रबोधन मोहिम राबविली होती. छत्रपती शिवाजी महाराज व क्रांतिसिंह नाना पाटील यांना ते आपल्या सयाजक्रांतीचे हिरो मानीत. १५ आगस्ट १९४७ घ्या स्वातंत्र्य प्राप्तीस ते केवळ *सत्तांतर* मानीत.कष्टकर्यांच्या हाल अपेष्टा दूर होतील तेच खरे स्वातंत्र्य असेल अशी त्यांची धारणा होती. दलीतांवरील अत्याचाराने व त्यांच्या ऊपेक्षेने ते व्यथीत होते.
अण्णाभाऊंचा चित्रपट व्यवसायाशी संपर्क आल्याने व त्यांच्या कथा कादंबर्याच्या पारितोषिके व थातूरमातूर राॅयल्टीमुळे त्यांना थोडीफार आर्थिक विवंचना कमी झाली.तरीही त्यांनी महाराष्ट्र शासनाने दिलेली ३खोलींची सदनिका नाकारून ते मजूरांच्याआस्थेपोटी त्यांच्या लगतच गोरेगावात झोपडीत राहिले होते. त्यांच्या वयाच्या पन्नाशीच्या दशकात ते विपन्नावस्थेतच जीवन जगत होते. तशात आजारपणाच्या कमजोरी ने वयाच्या ४८ व्या वर्षी १८जुलै १९६९ रोजी त्यांचा दारूण अंत झाला.
मोठीखंत
अण्णाभाऊ केवळ दीड दिवसांनी शाळेतून पाठ फिरवून घरीच शिकूनही अस्सल साहित्य सम्राट झाले. तरीही त्यांच्या साहित्याची दखल मराठी समीक्षकांनी घेतली नाही.
अण्णाभाऊ एक शाहीर-कलाकार व शोषीतांच्या पोटतिडकीसह संवेदनशील असे विद्रोही लेखक होते.त्यांनी कम्युनिस्ट पक्षात झोकून देऊन वर्ग संघर्षात कार्य केले असले तरी जातीय विषमतेविरूद्ध लढणार्या डाॅ.आंबेडकरांच्या समाजक्रांति बद्दलही त्यांना खुप आस्था होती.त्या संघर्षात सुद्धा भाग घेण्यासाठी त्यांची तगमग होत होती.
मराठीच्या प्रेमापोटी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात आपल्या कला पथकाद्वारे रात्रंदिवस प्रचार करीत राबण्याचे त्यांना फळ काय मिळाले?ना कोठे सन्मान ना प्रशस्ती.त्याऊलट तत्कालीन शासनाद्वारे तद्दन खोटा आळ घेऊन अमरावतीच्या जेलमध्ये 1½ महिन्याचा कारावास! ते एका गीतात दलीतांना वर्णवर्चस्वाविरुद्ध संघर्षासाठी झूंजारपणे प्रेरणा देतात:
"जग बदल घालूनी घाव|
सांगून गेले मज भीमराव||"
परिस्थितीशीअथक संघर्ष करणार्या एका प्रतिभावान साहित्यिक काॅम्रेडचा संघर्ष ४८व्या वर्षीच अधूरा राहिला.व आटोपला.
त्या क्रांतिकारी विद्रोही साहित्यिकास विनम्र आदरांजली !
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा