इडली डोश्याचा
MBA प्रवास
लेखक
©®मकरंद पिंपुटकर
चिंचवड, पुणे, 8698053215
१९८९ साली हैदराबाद शहरी लक्ष्मणराव शिंदे यांनी आपली सगळी जमापुंजी गुंतवली आणि एक रेकडी - ढकलगाडी विकत घेतली. आपल्या ८ वर्षांच्या मुलाच्या - रामच्या सोबतीने त्यांनी इडली डोश्याचा व्यवसाय सुरू केला. शाळा सांभाळून राम वडिलांना सकाळ - संध्याकाळ मदत करायचा. लक्ष्मणराव रोज वेगवेगळ्या ठिकाणी गाडी लावून नवनवीन ग्राहकांपर्यंत पोचायचे. हातची चव आणि बापलेकांची मेहनत यामुळे व्यवसाय ठीकठाक चालला होता. रोजचे खर्च निभत होते, रामच्या शिक्षणाचा खर्च निघत होता. पण ना धंद्याला म्हणावी तशी बरकत होती, ना गाठीशी पैसे साठत होते.
राम शिकत गेला, नुसता पदवीधर नव्हे तर MBA (मास्टर ऑफ बिझिनेस ॲडमिनिस्ट्रेशन) झाला. आता राम नोकरीसाठी ठिकठिकाणी अर्ज करू लागला, नोकरीच्या शोधात दारोदार फिरू लागला. पण देऊ केला जाणारा पगार त्याला काही पुरेसा वाटत नव्हता.
आपण आपलाच व्यवसाय नावारूपाला आणावा असंच त्याचं अंतर्मन त्याला सांगत होतं. आणि त्यानं तसंच केलं, तो पूर्णवेळ आपल्या वडिलांच्या व्यवसायात सहभागी झाला. वर्ष होतं २०११.
पण परिस्थिती आणि उत्पन्न "जैसे थे"च होतं. स्पर्धा होती मॉलमधील गाळ्यांशी आणि आजूबाजूच्या अन्य मोठ्या दुकानांशी - हॉटेल्सशी. लोकांना कमी पैश्यांत आणि कमी वेळात वैविध्य हवं होतं.
रामने या सगळ्याचा अभ्यास केला, आपलं व्यवस्थापनाचं (मॅनेजमेंट) पुस्तकी शिक्षण प्रत्यक्षात उतरायचं ठरवलं आणि मेनू आमूलाग्र बदलला. साध्या इडली डोश्यांसोबताच आता शेझवान डोसा, चीज डोसा, पिझ्झा डोसा, तवा इडली असे अनेकविध पदार्थ मिळू लागले. या नवनव्या पदार्थांची चर्चा शहरभर होऊ लागली, लोकं त्यांना शोधत येऊ लागले, आता त्यांना रोज वेगवेगळ्या ठिकाणी गाडी लावावी लागत नव्हती. उत्पन्न वाढलं, आणि गंमत म्हणजे ५० रुपयांच्या डोश्यापेक्षा १५० रुपयांच्या पिझ्झा डोश्यावर लोकं जास्त तुटून पडत होते. उत्पन्न वाढू लागलं होतं.
लक्ष्मणराव आजही सकाळी ८ वाजल्यापासून व्यवसायाला सुरुवात करत होते. ही वेळ आणखी लवकर करण्याची आयडिया रामला एका ग्राहकाकडून मिळाली. आयटी कंपनीत नोकरी करणारा तो ग्राहक सांगत होता, "आमची रात्रपाळी पहाटे ३ वाजता संपते. तुम्ही त्या वेळेला काही गरमागरम नाश्ता देऊ शकाल का ?"
बाप लेकांना हा विचार पटला. दुसऱ्या दिवशीपासून पहाटे ३ वाजता त्या भागातल्या आयटी क्षेत्रातल्या चाकरमान्यांना रात्रपाळी संपवून घरी जाताना भरपेट गरमागरम नाश्त्याचा एक समर्थ स्वादिष्ट पर्याय उपलब्ध झाला होता.
इतकं उत्पन्न आजवर कधीच मिळालं नव्हतं.
दहा वर्षांत या रामलक्ष्मणांच्या जोडीने चांगले बस्तान बसवले. २०२० साली त्यांच्या दोन नियमित ग्राहकांनी त्यांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी आर्थिक गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव ठेवला. जगभरातल्या करोना संकटामुळे हा प्रस्ताव थोडा लांबणीवर पडला पण २०२१ साली "राम की बंडी (हातगाडी)" च्या शहरभर पाच शाखा यशस्वीरीत्या सुरू झाल्या.
आज ७० हून जास्त माणसं आता इथं रात्रंदिवस कामाला आहेत आणि रोज हजारो ग्राहक यांच्याकडे क्षुधाशांतीसाठी येतात. खरंतर आता "राम की बंडी" हे फक्त पोट भरण्याचं ठिकाण राहिलेलं नाही, तो एक must visit अनुभव झाला आहे.
आता लक्ष्मणराव निवृत्त झाले आहेत. आणि आयुष्यभर जोपासलेल्या रोपाचा, आपल्या मुलाच्या नेतृत्वाखाली विशाल वटवृक्ष झालेला पाहून सुखावलेही आहेत आणि हरखलेही आहेत.
(सत्यघटना)
(आवडल्यास सामायिक करतांना सत्यकथेत कुठलाही बदल न करता मुळ लेखकाच्या नावासहच सामायिक करा ही विनंती. - मेघःशाम सोनवणे)
00000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा