प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे
भावी सनदी अधिकाऱ्यांचा दीपस्तंभ
लेखक
• मुरलीधर घाटोळ
डॉक्टर कालोनी,तपोवन,अमरावती
संवाद : 9422539467
अभियंता भवन शेगाव नाका अमरावती येथे 16 यूपीएससी उत्तीर्ण भावी सनदी अधिकाऱ्यांचा सामुहिक सत्कार ही बातमी वाचली आणि एकदम नरेशची आठवण झाली. मिशन आय ए एस.चे संचालक प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे हे नाव आता महाराष्ट्रातच नव्हे तर इतरही काही राज्यात स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत सुपरिचित झाले आहे.
मध्यप्रदेश छत्तीसगड झारखंड बिहार तामिळनाडू केरळ राजस्थान गुजरात उत्तर प्रदेश जम्मू कश्मीर ओरिसा कर्नाटक आंध्र प्रदेश जम्मू या प्रदेशातील विद्यार्थी जर मोठ्या संख्येने आय ए एस होतात तर माझ्या विदर्भातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी देखील कलेक्टर का होऊ शकत नाही ही त्यांची खरी तळमळ आणि त्याच भावनेने सुरु झाली त्याची 25 वर्षापूर्वी धडपड .आज जेव्हा महाराष्ट्रातून 93 मुले कलेक्टर होतात तेव्हा त्याचे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटते.
रिक्षा चालकाची मुलगी शेतकऱ्यांची मुले रंगकाम करणाऱ्या मजुराची मुलगी कलेक्टर झाली आहेत. अशी अनेक उदाहरणे देता येतील की जी मुले आज यूपीएससी आणि एमपीएससी च्या परीक्षेच्या माध्यमातून उत्तीर्ण झाली आणि मोठमोठ्या पदावर नियुक्त होऊन विदर्भाचा नावलौकिक वाढवित आहेत. नि:संशय त्यांना अनेकांचे मार्गदर्शन लाभले असेल पण ज्यांचा मुख्य प्रेरणास्त्रोत मात्र प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळेच असेल असे मी विश्वासाने म्हणू शकतो. कारण ज्या काळी विदर्भातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षाबद्दल जराही जाण नव्हती तेव्हा नरेशचंद्र काठोळे यांनी अनेक शाळा महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा बाबतीत मार्गदर्शन केले आहे. निवासी शिबिरे घेतली आहेत. इतकेच नव्हे तर२५ वर्षापूर्वी विद्यापीठ रोडवरील जिजाऊ नगरात स्वतःच्या घरी विनामूल्य अभ्यासिका सुरू केली आहे .
हे सर्व निस्वार्थ भावनेने स्वतःची पदरमोड करून का बरं करावेसे वाटले असेल. मला वाटते जो भोगतो तो जाणतो. प्राध्यापक आणि डॉक्टरेट ही पदवी प्राप्त करताना त्यांना कोणकोणत्या दिव्यातून जावे लागले आणि या मुक्कामावर पोचण्यासाठी किती संघर्ष करावा लागला हे फार थोड्या जणांना माहीत आहे .त्यापैकी मी एक आहे. प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे आणि मी महाविद्यालयीन मित्र .1970 ला मी राज महाविद्यालयात म्हणजे आजच्या केशरबाई लाहोटी महाविद्यालयात प्रवेश घेतला. तेव्हाची आमची प्रथम ओळख. आम्ही क्लासमेट नंतर डेस्कमेट होतो आणि डेस्कमेटचे सोलमेट केव्हा झालो ते दोघांनाही कळले नाही. आम्ही दोघेही मराठी वाङ्मयाचे विद्यार्थी. त्यामुळे साहजिकच कविता कथा कादंबऱ्या यांचा सहवास मिळाला. प्रथितयश लेखक कवी प्राध्यापक मधुकर केचे यांच्या उद्भबोधनाचा लाभ मिळाला. साहित्याची बिजे नरेशच्या मनात तेव्हाच रुजल्या गेली.
महाविद्यालयीन जीवनातच नरेशमध्ये संघटन कौशल्याची पहिली पावती मिळाली .त्यांनी तत्कालीन नवोदित कवी कथाकार त्यांच्याशी विविध जाऊन संपर्क साधला आणि कधी मालटेकडीवर तर कधी केशरबाई लाहोटी महाविद्यालयात तर कधी नेहरू मैदानातील नगरपालिका उद्यानात तर कधी एखाद्या मित्राच्या खोलीवर अनेक कवी संमेलन घेतली आणि त्यातून जन्माला आली अमरावतीमधील पहिली साहित्य संस्था. साहित्य संगम. या संस्थेचे पहिले अध्यक्ष होते डॉ. बबन सराडकर. नंतर साहित्यावर जीवापाड प्रेम करणारे स्व. डॉक्टर मोतीलालजी राठी यांच्याकडे संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा आली.
साहित्य संगम संस्थेच्या वतीने नरेशने पहिला प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशित केला .झेप. हे त्या कवितासंग्रहाचे नाव. यामध्ये तेव्हाचे नवोदित कवी पण आताचे लोकमान्य कवी सर्वश्री बबन सराडकर श्रीकृष्ण बनसोड अशोक थोरात सुनीला झोड सुखदेव ढाणके विनय मिरासे अशोक काळे असे कितीतरी सिद्धहस्त साहित्यिक उदयास आले. प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे यांचे वडील अमरावतीच्या श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयात चपराशी होते. इथपर्यंत नरेशचा जीवन प्रवास त्याच्या साहित्यिक चळवळी अगदी सुरळीत चालू होत्या. पण नियतीला हे मंजूर नसावे. बीए फायनलचा निकाल लागल्यानंतर नरेशने अमरावतीच्या शासकीय विदर्भ महाविद्यालयात एम ए मराठीला प्रवेश घेतला .अन अचानक वडिलांचे आकस्मिक निधन झाले. आभाळच कोसळले. आता पुढे काय करावे आणि कसे ? असे अनेक प्रश्न नरेशला भंडावून सोडत होते. मोठ्या भावाचा फिरता व्यवसाय. तुटपुंजी मिळकत आणि वडिलांचे थोडीशी पेन्शन एवढाच काय तो आधार .घरात दोन लहान बहिणी आणि एक भाऊ. इथूनच सुरू झाला नरेशच्या जीवनातील खरा संघर्ष.
माझे मूळ गाव वलगाव. त्याकाळी 60 पैशात दिवसभरासाठी सायकल भाड्याने मिळत होती .नरेश सायकलने वलगावला यायचा. माझ्या आईच्या हातची भाजी भाकरी त्याला खूप आवडायची. माझ्या वडिलांचे आणि तत्कालीन श्री गणेशदास राठी छात्रालय समितीचे सचिव स्व.श्री सत्यनारायणजी लढ्ढा यांचे बऱ्यापैकी सख्य होते .मी माझ्या बाबांना नरेशच्या परिस्थितीशी अवगत केले आणि विनंती केली की आपण सचिव साहेबांना नरेशला अनुकंपा तत्वावर योग्य अशा पदावर नियुक्त करा .बाबांनी ऐकले. सचिव साहेबांनी देखील मान्य केले आणि आजचे प्राध्यापक डॉक्टर नरेशचंद्र काठोळे यांच्यामुळे अनेक सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांचे करिअर घडत आहे त्यांचे स्वतःचे करिअर मात्र राज महाविद्यालयातील एक प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून सुरू झाले. हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.
कुटुंबाकडे जराही दुर्लक्ष होऊ न देता स्वतःचे शिक्षण सर्वांचे पालन पोषण शिक्षण आणि विवाह या सर्व दिव्यातून जाताना एम. ए.
बी. एड. पीएच.डी पर्यंतचा प्रवास नरेशने कसा पूर्ण केला हे फक्त त्यालाच माहीत .अशातच डॉ. मोतीलालजी राठी यांचे त्याला पुत्रवत प्रेम लाभले .त्यांच्याच आशीर्वादाने प्रथम काही दिवस त्याने धामणगावच्या आदर्श कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात धामणगावला प्राध्यापकी केली आणि नंतर निवृत्त होईपर्यंत अमरावतीच्या राजापेठ भागातील भारतीय महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून सेवा केली.
निवृत्तीनंतरही त्याच्यातील कार्यशीलता तेवढीच गतिमान आहे. नरेशच्या घरी त्याची भेट होणे म्हणजे कठीणच. कारण नरेश आज चंद्रपुरात तर उद्या कोल्हापुरात परवा बिहारात तर कधी राजस्थानात पायाला चाके फुटल्यावर तो सतत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करीत भिरभिरत असतो. थकणे हा शब्द त्याच्या कोशातच नाही. आता वयाच्या 73 व्या वर्षी देखील त्याचा उत्साह आणि धडपड शब्दातीत आहे. अर्थात त्यामागे असलेली सच्ची तळमळ त्याला स्वस्थ बसू देत नाही. नरेश तुझ्यातील या ऊर्जेला त्रिवार सलाम आणि एक जुलैच्या वाढदिवसासाठी हार्दिक शुभेच्छा.
00000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा